ठाणे : तेल अवीवच्या धर्तीवर राबविण्यात येणारा ‘डिजी ठाणे’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात उतरावा, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली आहे. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या मॉलधारकांची बैठक घेऊन या प्रकल्पाची संकल्पना त्यांना समजावून सांगण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाणही उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासन ते नागरिक, व्यावसायिक ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक असा समन्वय साधण्यात येणार असून, महापालिकेच्या सर्व सुविधांची देयके भरण्यापासून ते शहरातील विविध ठिकाणी खरेदी करण्यासाठी या ‘डिजी कार्ड’चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा जसा नागरिकांना मिळणार आहे, तसाच तो व्यावसायिकांनाही मिळणार असल्याचे या वेळी जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
‘साधारणतः दोन ऑक्टोबर २०१७ रोजी ‘डिजी कार्ड’चे लोकार्पण करण्याचा मानस असून, तोपर्यंत शहरातील सर्व भागधारकांशी चर्चा करून या प्रकल्पाची माहिती देण्यात येणार आहे. क्रेडिट कार्डच्या धर्तीवरच या ‘डिजी कार्ड’ची निर्मिती करण्यात येणार असून, त्या माध्यमातून महापालिकेच्या विविध सेवांची देयके देण्याची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे,’ असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.